पुढील काही दिवस अवकाळी पावसाची शक्यता डॉ मछिंद्र बांगर म्हणतात..
डॉ. मच्छिंद्र बांगर यांनी ८ ऑक्टोबर २०२५ रोजी महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थितीचा ताजा अंदाज दिला आहे. अरबी समुद्रातील ‘शक्ती’ चक्रीवादळ आता तीव्र कमी दाब ते कमी दाब (Low Pressure) या अवस्थेत विरून जाण्याच्या मार्गावर आहे. याचा महाराष्ट्रावर किंवा भारतावर फारसा परिणाम होणार नाही. बंगालच्या उपसागरात थोडेफार बाष्प असले तरी आता पावसासाठी विशेष वातावरण राहिलेले नाही. त्यामुळे मान्सूनचा परतीचा प्रवास अतिशय जलद गतीने होईल.
मान्सूनचा परतीचा प्रवास आता आश्चर्यकारक पद्धतीने वेगाने होणार आहे. महाराष्ट्रासह राजस्थान, गुजरात, कर्नाटक, तेलंगणा, छत्तीसगड आणि बिहारपर्यंत अनेक भागातून पाऊस उघडला आहे. डॉ. बांगर यांच्या अंदाजानुसार, १० किंवा ११ ऑक्टोबरपर्यंत मान्सून महाराष्ट्रातून माघार घेईल. भारतीय हवामान खात्याकडून कोणत्याही क्षणी मान्सून गेल्याचे जाहीर केले जाऊ शकते. १५ ऑक्टोबरच्या आधीच हे जाहीर करावे लागेल, कारण १५ तारखेपासून ईशान्य मान्सूनचा प्रभाव सुरू होणार आहे.
सध्या महाराष्ट्रात हवेचा दाब १०१३ हेक्टा पास्कलपर्यंत वाढला आहे. हवेचा दाब वाढल्यास पावसाचे प्रमाण कमी होते. ९ ऑक्टोबर रोजी सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्गमध्ये पावसाचा अंदाज आहे, मात्र १०, ११, १२ आणि १३ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रातून पाऊस पूर्णपणे उघडेल. या काळात महाराष्ट्राच्या उत्तरेकडील (उत्तर महाराष्ट्र, उत्तर मराठवाडा, विदर्भ) भागात पूर्णतः उघडीप असेल. उत्तरेकडून वारे प्रवाहित होत असल्याने पहाटे थंडी जाणवण्यास सुरुवात होईल.
येत्या काळात महाराष्ट्रात होणारा पाऊस हा नैर्ऋत्य मान्सूनचा नसून, तो ईशान्य मान्सून किंवा अवकाळी पाऊस असेल. १९ ऑक्टोबरनंतर बंगालच्या उपसागरात आणि २० ऑक्टोबरला अरबी समुद्रात अतिशय पोषक वातावरण तयार होत आहे. यामुळे २२ ऑक्टोबरच्या आसपास महाराष्ट्राच्या अनेक भागांत पुन्हा ईशान्य मान्सून बरसणार आहे. यावर्षी ईशान्य मान्सूनचे तंत्र थोडे बदलत असून, तो भारताच्या अंतर्गत भागापर्यंत पोहोचताना दिसतो आहे. हा पाऊस ओरिसा, छत्तीसगड, तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तामिळनाडू आणि केरळमध्येही होईल.
महाराष्ट्रात होणाऱ्या या ईशान्य मान्सूनचा प्रभाव फार नुकसानकारक नसेल. तो शिडकाव्याच्या स्वरूपात किंवा काही ठिकाणी मध्यम स्वरूपात पडेल. हा पाऊस पिकांची भरणी करण्यासाठी किंवा पेरणीसाठी पोषक ओलावा देऊन जाईल. मात्र, २० आणि २१ ऑक्टोबरचा पाऊस महाराष्ट्रासाठी तापदायक ठरू शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी काढणीला आलेली सोयाबीन किंवा मका यांसारखी खरिपाची पिके उघडीप मिळाल्याच्या काळात तात्काळ काढून सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवावीत, असा महत्त्वाचा सल्ला डॉ. बांगर यांनी दिला आहे.








