महाराष्ट्रातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा..मुख्यमंत्री फडणवीसांची मोठी घोषणा.
नुकत्याच झालेल्या वादळी पावसाने राज्यात थैमान घातले आहे, ज्यामुळे अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. विशेषतः खान्देश, मराठवाडा आणि सोलापूर येथे परिस्थिती बिकट झाली आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे; पुराच्या पाण्यात पीक वाहून गेले आहे, सोबतच शेतातील मातीसुद्धा वाहून गेली आहे.
अनेक गावांना या पुराच्या पाण्याचा मोठा तडाखा बसला आहे. नद्यांना आलेल्या पुरामुळे राज्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. घरे पाण्याखाली गेल्याने संसारोपयोगी साहित्य देखील वाहून गेले असून, अनेक नागरिक रस्त्यावर आले आहेत. शेतीसोबतच घरादाराचेही मोठे नुकसान झाले आहे.
मराठवाड्यात सर्वाधिक नुकसान झाले आहे, कारण गेल्या काही दिवसांपासून या भागात मुसळधार पाऊस सुरूच आहे. यामुळे उभी पिके पाण्याखाली गेली असून, शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. नद्यांना आलेल्या पुराचे पाणी गावात शिरल्याने काही ठिकाणी गावाला पुराचा वेढा पडला असून नागरिक अडकले आहेत. या पुरात अडकलेल्या नागरिकांसाठी बचाव आणि मदत कार्य युद्धपातळीवर सुरू आहे.
दरम्यान, आता या नुकसानग्रस्तांचे डोळे सरकारच्या मदतीकडे लागले आहेत. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठी घोषणा केली आहे. त्यांनी आज औसा आणि निलंगा तालुक्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची पाहणी केली. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, सर्व निकष बाजूला ठेवून शेतकऱ्यांना सरसकट मदत करणार आहोत. कुठेही अधिकचे निकष न लावता आणि आवश्यकता असेल तर निकष शिथिल करून सरकारला नागरिक केंद्रित मदत करायची आहे.
“ऑलरेडी आम्ही पैसे रीलीज करायला सुरुवात केली आहे,” असे मुख्यमंत्री म्हणाले. नुकसानग्रस्तांच्या मदतीसाठी २ हजार २०० कोटी रुपयांचा पहिला हप्ता मंजूर झाला आहे. दिवाळीपूर्वीच सर्व शेतकऱ्यांना मदत मिळेल असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांना आता काही प्रमाणात दिलासा मिळण्याची शक्यता आहे.








