मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा ओला दुष्काळ जाहीर करण्यास नकार..
पहिल्या टप्प्यात २,११५ कोटींचे वाटप सुरू.
ऑगस्टपर्यंत झालेल्या पिकांच्या
नुकसानीसाठी २,११५ कोटी रुपयांची मदत शेतकऱ्यांना वाटप करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचेही फडणवीस यांनी सांगितले. त्याशिवाय, खरीप हंगामात झालेल्या प्रचंड नुकसानीसाठी अतिरिक्त निधी दिला जाणार आहे.
शेतकऱ्यांना कर्ज वसुलीची नोटीस?
अनेक शेतकरी पुर आणि अतिवृष्टीमुळे उध्वस्त झालेले असताना बँकांकडून कर्ज वसुलीच्या नोटिसा दिल्या जात असल्याची माहिती पुढे आली होती. यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्टीकरण देताना सांगितले की या नोटिसा जुन्या कर्जांसाठी आहेत. मात्र, बँकांना कर्ज वसुलीची कारवाई थांबवण्याचे आदेश देण्यात येतील, असे त्यांनी स्पष्ट केले.
विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
दरम्यान, काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर तीव्र टीका केली आहे. त्यांनी सांगितले की, सप्टेंबरमधील पावसामुळे २४ जिल्ह्यांतील १३७ तालुक्यांमध्ये २६ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. तरीदेखील केंद्राकडून मदतीचा प्रस्ताव तातडीने पाठवण्यात आलेला नाही आणि केंद्रीय पथके अद्याप पाहणीसाठी आलेली नाहीत, असा आरोप त्यांनी केला.
मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राला सर्वाधिक फटका
मराठवाड्यातील लातूर, बीड, नांदेड, परभणी, धाराशिव, जालना, संभाजीनगर आणि पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर, सातारा, सांगली या जिल्ह्यांना अतिवृष्टीचा मोठा फटका बसला आहे. लाखो हेक्टरवरील खरीप पिके पाण्यात गेल्याने रब्बी हंगामही धोक्यात येण्याची भीती व्यक्त होत आहे.
दिवाळीपूर्वी मदतीचे आश्वासन
“शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी खात्यात मदत मिळेल याची खबरदारी घेऊ. नुकसानाची अचूक आकडेवारी मिळाल्यानंतर व्यापक मदत पॅकेज जाहीर केले जाईल,” असे आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले.








