शेतकऱ्यांना मोठा दिलासा ; दिवाळीपूर्वी मदतीची घोषणा.
शेतकऱ्यांना मोठा दिलासा ; राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टी आणि नैसर्गिक आपत्तीमुळे मोठे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वीच मदत मिळण्याचे संकेत दिसत आहेत. यापूर्वी राज्य सरकारने पहिल्या टप्प्यात २२१५ कोटी रुपयांचे वितरण मंजूर केले असले तरी, या कालावधीत मोठ्या प्रमाणात झालेले नुकसान (जनावरांचा मृत्यू, जमिनी खरडणे, पिके पाण्याखाली जाणे) तसेच पायाभूत सुविधांचे झालेले मोठे नुकसान (रस्ते/पूल वाहून जाणे, घरे/दुकानांमध्ये पाणी शिरणे) पाहता, ही मोठी मदत लवकर मिळणे अपेक्षित आहे. यासाठी राज्य शासनाने नुकसानीचा सविस्तर प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला आहे.
याच महत्त्वाच्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर, देशाचे गृहमंत्री अमित शहा हे ५ ऑक्टोबर २०२५ रोजी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या या दौऱ्यातच शेतकऱ्यांसाठी काहीतरी मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे.
प्रशासकीय स्तरावर, पुढील आठवड्यापर्यंत मदतीचे सर्व प्रस्ताव राज्य शासनाला पाठवले जातील आणि वितरणाची प्रक्रिया तातडीने सुरू होईल. विशेषतः, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांमुळे आणि नोव्हेंबरमध्ये आचारसंहिता लागू होण्याची शक्यता असल्याने, आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच, म्हणजेच दिवाळीच्या शुभमुहूर्तावर ही मदत शेतकऱ्यांच्या हाती पडेल, असे नियोजन सरकारला पूर्ण करावे लागणार आहे.
इतर राज्यांमध्ये जाहीर झालेल्या मदतीच्या तुलनेत महाराष्ट्रात काय घोषणा होते, याकडे लक्ष लागले आहे. पंजाबमध्ये हेक्टरी ५०,००० रुपयांची (केंद्र सरकारकडून थेट) आणि कर्नाटकमध्ये हेक्टरी १७,००० रुपयांची (केंद्र आणि राज्याची मदत मिळून) घोषणा झाली आहे.
या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र सरकार राज्याच्या मदतीची म्हणून काय घोषणा करते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. केंद्र सरकारकडून राज्याला सुमारे ३,२८० ते ३,३०० कोटी रुपये मिळण्याची शक्यता आहे. याशिवाय राज्य शासनाकडून एसडीआरएफ (SDRF) च्या निधीतून तसेच अतिरिक्त निधीतून, नुकसान भरपाईच्या ‘दुप्पट’ किंवा ‘दीडपट’ मदत जाहीर केली जाते का, याकडे सर्वांचे लक्ष आहे. या मदतीची नेमकी घोषणा पुढील आठवड्यात केली जाऊ शकते, ज्यामुळे बळीराजाला मोठा आधार मिळेल.








