Low pressure area ; राज्यात कमी दबाचे क्षेत्र महाराष्ट्रात पावसाचा धुमाकूळ
Low pressure area ; बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यामुळे महाराष्ट्रात पावसाचा जोर कायम राहणार आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज, बुधवारी संपूर्ण राज्यात तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे.
मराठवाडा, विदर्भ, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये आज पाऊस पडण्याची शक्यता आहे. मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशीव जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. विदर्भात अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्याचप्रमाणे, कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, नाशिक, अहमदनगर आणि पुणे जिल्ह्यांतही तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.
उद्या, गुरुवारीही राज्याच्या अनेक भागांत पावसाचा जोर कायम राहील. मराठवाड्यातील परभणी, हिंगोली, नांदेड आणि धाराशीव जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. विदर्भात चंद्रपूर जिल्ह्यात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता असून, भंडारा, अमरावती, अकोला, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा आणि यवतमाळ जिल्ह्यांतही तुरळक ठिकाणी पाऊस पडेल. मध्य महाराष्ट्र आणि कोकणात कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, पुणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे.
शुक्रवारपासून राज्याच्या बहुतांश भागांत पावसाचा जोर वाढेल. मराठवाडा, विदर्भ, कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता अधिक आहे. विशेषतः शनिवारी लातूर आणि धाराशीव जिल्ह्यांसह कोकणातील ठाणे, मुंबई, रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांत अतिजोरदार पावसासाठी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्रातील पुणे आणि कोल्हापूरच्या घाट माथ्यावरही अतिजोरदार पावसाचा अंदाज आहे. याव्यतिरिक्त, जळगाव, नाशिक, अहमदनगर आणि पुणे जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे.
मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरू झाला आहे. पंजाब, हरियाणा, चंदीगढ आणि दिल्लीच्या काही भागातून मान्सूनने माघार घेतली आहे. तसेच, गुजरात आणि राजस्थानच्या काही भागांसह मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश आणि जम्मू काश्मीरच्या काही भागातूनही मान्सून परतला आहे. पुढील दोन ते तीन दिवसांत मान्सून आणखी काही भागातून निरोप घेण्यास वातावरण अनुकूल असल्याचं हवामान विभागाने नमूद केलं आहे.








